Saturday, February 20, 2010

पुण्यातील वाहतुकीचे अर्थकारण

पुण्यात दुचाकी वाहनांसाठी रस्त्यारस्त्यांवर वाहने लावण्यासाठी‌ शुल्क आकारले जात आहे. मुळातच पुण्यात सार्वजनिक वाहतुकीची अवस्था दयनीय आहे (BRTने काही फार सुधारणा होईल असे वाटत नाही. त्याबद्दल वेगळे बोलू.). त्यामुळे स्वत:ची वाहने चालवायला लागणे अपरिहार्य आहे, परिणामत: दिवसेंदिवस पुण्यातील वाहने वाढत आहेत, ती लावण्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध नाही, ती चालवण्यासाठी‌ रस्ते कमी पडताहेत, आहेत त्या रस्त्यांची अवस्था काय विचारता,  आणि आता वाहने लावण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात तेही २ रुपये प्रति तास या प्रचंड दराने! म्हणजे आई जेऊ घाली‌ ना आणि बाप भीक मागू देई ना त्यातली गत झाली.

या सगळ्या प्रकारात फायदा कोणाचा झाला? वाहने तयार करणाऱ्या, ती‌ विकणाऱ्या कंपन्या, गॅरेजेस् इ. रस्त्यांवर पार्किगचे ठेके घेणारे ठेकेदार यांचा! ह्या धंद्यांमधून कोणाचं उखळ पांढरं होणार ते वेगळं सांगण्याची गरज नाही. एवढं करून ह्या सेवा चांगल्या दर्जाच्या आहेत का हा प्रश्न विचारणं मूर्खपणा!

महानगरपालिकेला जो कर आपण देतो त्यात पथकर नामक एक प्रकार बहुतेक (!) असतो. त्याचप्रमाणे वाहने विकत घेताना त्यावर वाहने चालविली जाणार म्हणून एक कर लावतात. हा पैसा घेतल्यावर तत्संबंन्धी सेवा विनामूल्य देणे महानगरपालिकेला कर्तव्य वाटत नाही काय? जर हे कर नागरिक इमाने इतबारे भरत असतील तर महानगरपालिकेचे पार्किंगसाठी विनामूल्य जागा आणि सेवा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे, त्त्यासाठी मूल्य कसे आकारता येईल? ह्या मूल्यावर सेवाकर/आयकर वगैरे भरला जातो का हा वेगळा विषय!

मुळात पुण्य़ातल्या सर्व वाहतूकविषयक प्रश्नांचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सोपं उत्तर असताना मुद्दाम द्राविडी प्राणायाम कशाला? तरी बरं महानगरपालिका दरवर्षी कोट्यावधींनी अनुदानं 'पुणे महानगर परिवहन महामंडळा' ला (नाव बदललं तरी माणूस बदलत नाही.) देते आहे ती‌ नागरिकांकडून गोळा केलेल्या करांमधूनच! त्यात ह्या बसगाड्यांची तिकिटंही महाग आहेत (जवळजवळ १ रुपया प्रति कि.मी.). इतका पैसा या महामंडळाकडे जात असताना सर्वांना सोयीची सेवा हे मंडळ देऊ का शकत नाही?

तोपर्यंत, मी आपल्या गाडीवरून कुठेही गचके न खाता कार्यालयात पोचलो आहे, हे रस्ते सरळ सपाट आहेत, त्यांचा एकच थर आहे, रस्त्याच्या दोऩी बाजू समान पातळीवर आहेत, सर्व सिग्नल्स् व्यवस्थित चालत आहेत किंवा मला बसस्थानकावर गेल्यावर फार वाट न पाहता बस आली आहे, ती स्थानकासमोर सगळे प्रवासी चढे/उतरे पर्यंत थांबली आहे, वाहक सौजन्यापूर्वक बोलत आहे, सुटे पैसे व्यवस्थित वेळेवर परत देत आहे, मला आणि सर्वच प्रवाशांना बसायला जागा मिळाली आहे. बसायची‌ जागा स्वच्छ आहे असे पसायदान गायला काय हरकत आहे!

Sunday, February 07, 2010

रीटा, च्या आणि केळफा

कधी‌ नव्हे ते गेल्या दोन तीन महिन्यांत लागोपाठ चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायचा योग आला. हे तीनही‌ मराठी चित्रपट होते हे विशेष! आणि तीनही‌ चित्रपट पाहणं हा सुखद अनुभव होता.

रीटाचा विषय वेगळा होता, त्याबद्दल मतभेद असतील पण  त्याविषयाची हाताळणी फारच प्रसन्न आणि प्रगल्भ वाटली. विशेषत: पल्लवी‌ जोशीचा अभिनय 'एकदम चाबूक', अगदी‌ जागेवर उभे राहून आणि जोरदार टाळ्या वाजवून दाद देण्याइतका. (मी काही‌ खुर्चीवरून उठून पुढे जाऊन इतर काही करू शकत नाही‌ ;) तेव्हा इतकंच!) तिचं‌ सुरूवातीला खिडकीवर उलटं‌ 'रीटा' लिहून आपण वेड्याच्या इस्पितळात असलो तरी‌वेडे नाही‌ हे दाखवण्याच्या प्रसंगातून पुढे किती‌ छान दिग्दर्शनाचा नमुना पहायला मिळणार आहे याची झलक मिळाली. पुढे उत्तरोत्तर कथा फुलत गेली अगदी शेवटच्या प्रसंगापर्यन्त. रेणुका शहाणेचं‌ कौतुक करावं तेवढं थोडंच! वास्तविक असा विषय असताना चित्रपट उत्तान/बीभत्स करणं काही‌ अवघड नव्हतं, ('कभी अलविदा ना कहना' आठवतोय?) पण तरीही तो अतिशय संयतपणे चित्रित झाला आहे. रीटाची असे असामान्य नाते जपण्यासाठी होणारी ओढाताण, तरीही त्यातले पावित्र्य जपण्याचा प्रयत्न आणि ते पावित्र्य सिद्ध करण्याचा तिचा अट्टाहास, त्या प्रयत्नात तिचं झालेलं पतन आणि त्या जाणीवेनं स्वत:वरचा आलेला राग आणि मानसिक आघात, याबरोबरीने वेगवेगळ्य़ा पातळ्यांवर घरच्या वातावरणाचा होणारा परिणाम फार सुन्दर चित्रित झाला आहे. चित्रपट पाहिल्यावर जसं मन रितं होतं तसंच चांगली कलाकृती पाहिल्याच्या आनंदाने भरतंही.

सुमित्रा भावे आणि मंडळीच्या साच्यातल्या 'एक कप च्या' हा दुसरा चित्रपट. वास्तुपुरूष, देवराई, वळू वगैरे यादीत फिट्ट बसणारा! तिथे वेगळा संघर्ष. सगळ्या कलाकारांनी‌ काम छान केलं आहे. फक्त एकच कोंकणातल्या मराटीचे हेल नीट जमलेले नाहीत असं वाटलं. एखाद्या सामान्य माणसाला आपल्या तत्त्वांसाठी काय संघर्ष करावा लागतो, आनी‌हे करत असताना त्याला घरातले सगळे कशी साथ आणि सहकार करतात हे पाहून आपल्यालाही उभारी येते. विशेषत: यात 'साता समिंदरापार ब्रह्म्याची सृष्टी' या ओवीचा फारच छान उपयोग केला आहे. हे पूर्ण काव्य कोणाला माहीत असेल तर मला देऊ शकेल का?

तिसरा चित्रपट 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'. दादासाहेब फाळके यांनी‌ काढलेल्या पहिल्या मराठी‌ (आणि भारतीय़) चित्रपटाच्या निर्मितीची कथा. प्रसन्न सादरीकरण, योग्य तंत्रांचा वापर आणि अर्थातच अभिनय यामुळे चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. कथा जितकी मनोरंजक आहे तितकाच चित्रपटही देखणा झाला आहे. कमीतकमी दोन बादल्या अश्रू गाळण्याची‌ ताकद कथेत असूनही तो लोभ टाळला आहे. फाळके यांनी हा चित्रपट करण्य़ासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांचा संघर्ष हसत खेळत दाखवला आहे, पण त्यातलं गांभीर्य तसुभरही कमी न होऊ देता. कदाचित दादासाहेबांच्या स्वभावानुसार ही संट त्यांनीही अशीच हसत खेळत पेलली असतील. ऑस्करचे आव्हान हा चित्रपट पेलू शकेल अशी आशा वाटते, त्यासाठी शुभेच्छा!

एकही‌ गाणं नसणं हे या तिघांचंही आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल.  चित्रपट पाहिल्यावर मला नको नको वाटत असताना गेल्या काही दशकांतल्या बहुसंख्य भयानक चित्रपटांची आठवण झाली. भयानक कपडेपट, भयानक नाच आणि गाणी, भयानक संकलन, भयानक दिग्दर्शन अशा अनेक भयानक गोष्टींनी भरलेले ते भयानक चित्रपट! लक्ष्या, सराफ यांच्या इनोदी चित्रपटांची परंपरा अजूनही भरत आणि मकरंद चालवत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे चित्रपट असणं आल्हाददायक आहे. कसदार कथा आणि तिला साजेसं दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, पार्श्वसंगीत, आणि जोडीला उत्कृष्ट सादरीकरण, संकलन इत्यादी तांत्रिक बाबी ह्या चांगल्या गोष्टींचं महत्त्व पटवण्यासाठी मधला भयानक चित्रपटांचा कालखंड एखाद्या वाईट स्वप्नासारखा आला अशी समजूत करायला हरकत नाही. असेच चांगले चांगले चित्रपत मराठीत निर्माण व्हावेत आणि ते आम्हाला पहायला मिळावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ता.क. हे लिहून झाल्यावर 'नटरंग' पाहिला पण या यादीत तो नको :)

Wednesday, February 03, 2010

साडीपुराण

"अरे, जरा पुढे हो, मला त्या नवरीनं नेसलेली‌ साडी‌ पहायची‌ आहे, पिवळ्या रंगाला जांभळे काठ असलेली", माझी बायको मला पुढे ढकलत होती. एका लग्नात आम्ही‌ अगदी‌ ऐन मुहुर्ताला पोचलो होतो. त्यामुळे कार्यालयाच्या दारातून अनेक जणांच्या खांद्यांवरून लांब व्यासपीठावर उभ्या असलेल्या वधुवरांना, टाचा उंचावून पाहण्याचा प्रयत्न चालू‌ होता. पुढे मुंगीलाही‌ शिरायला जागा नव्हती. माणसं‌ दाटीवाटीनं‌ माणसं‌ उभी‌ होती.

"अगं, आपण त्यांना भेटायला जाऊ तेव्हा दिसेल ना तुला.", मी‌ समजुतीच्या स्वरात म्हणालो.
"तुम्हा नवऱ्यांना काही‌ कळत नाही‌ हेच खरं."‌, समस्त नवरे जातीचा उद्धार करून युगानुयुगे चालत आलेल्या संवादाची‌ नांदी‌ झाली. "लग्न लागल्यावर नवरी‌, ती‌ साडी‌ बदलणार नाही‌ का? मग भेटताना ती‌ मी‌ कशी‌ पाहू? आणि काय रे, आपल्या लग्नात मी‌ लग्नानंतर साडी‌ बदलली‌ होती‌, हे पण तुला आठवत नाही?". नेहमीची प्यादी चाल करून यायला लागली. पुढे होणं खरंच शक्य नव्हतं. माझ्या पुढे एका बाजूला काही‌ महिला आणि मुली‌ आपापल्या साड्या/पेहरावाबद्दल चर्चा करण्यात गुंग झाल्या होत्या. त्यांनी‌ नवरीची‌ साडी‌ 'बघून' घेतली‌ असावी‌ किंवा ते प्रयत्न सोडून दिले असावेत. माझी‌ पुढे होण्यासाठी‌ जागा द्यायची‌ विनंती‌ त्यांच्या कानावरून देखील गेली‌ नव्हती. दुसऱ्या बाजूला काही‌ पोक्त बायका इतर महिलांच्या साड्यांबद्दल बोलत (म्हणजे टीका करत) होत्या. त्यांची‌ आपापल्या साड्यांबद्दलची‌ चर्चा संपली असावी किंवा आपापल्या साड्यांवर टीका करणे शक्य नसल्याने, जास्त चविष्ट चर्चेकडे वळल्या असाव्यात. त्यांना विनंती‌ केल्यावर, 'हा कोण टिक्कोजीराव', अशा अर्थाच्या फक्त नजरांनी (काही चष्म्यातून, काही‌ चष्म्यावरून), मला नमवून आपल्या चर्चेत मश्गुल झाल्या. एक-दोन पुरूष जे माझ्या पुढे होते त्यांचं लक्ष बायकांकडे (आपापल्या) होतं. त्यांचं दु:ख माहित असल्यामुळे त्यांना माझ्या विनंतीकडे लक्ष देणी जमणार नाही हे मला कळलं. पुढे करण्यासारखं काही नसल्याने, मी माझ्यावरचा हल्ला परतवत म्हणालो, "पण समजा नाही‌ पाहिलीस साडी तर काही बिघडणार आहे का?". मी काहीतरी चुकीचं बोललो हे हिच्या चेहऱ्यावरून मला कळलं.
"परवा आमची‌ भिशी‌ आहे, तिथे बायकांनी‌ 'पाहिलीस का लग्नातली साडी' असं विचारलं, तर मी‌ काय उत्तर देऊ?", स्वरात जरा आता चीड डोकावू लागली‌ होती.
"सांग ना पाहिली म्हणून. हो म्हणायला काय जातंय तुझं?", मी.
"तेवढंच नसतं रे ते, ", आता चिडीची‌ जागा सहानुभूतीने घेतली. माझं अज्ञान दूर करण्याच्या हेतूने, अर्जुनाला ज्याप्रमाणे भर युद्धात कृष्णाने उपदेश केला, त्याप्रमाणे मला लग्नाच्या भर मांडवात उपदेश करण्यास सुरुवात केली.
"हा प्रश्न म्हणजे तर सुरुवात असते. पुढे त्या साडीचं एक एक अंग घेऊन त्यावर सविस्तर चर्चा होते." मला वाटत होतं, अंग झाकण्यासाठी‌ साडी नेसतात, पण साडीलाही‌ अनेक अंग असतात हे मला नवं होतं. "काठ कसे आहेत, पदर कसा आहे. साडीच्या मुख्य रंगाला ते जुळताहेत का? साडीवर बुट्टे कसे आहेत? नक्षी‌काम कसे आहे? साडीचा पोत कसा आहे?  इथून चर्चा सुरू होऊन, ती साडी नवरीला कशी‌ दिसते हा निष्कर्ष निघेपर्यंत ती‌ चर्चा रंगते. हा निष्कर्ष नकारात्मक असेल तर चर्चा जास्त रंगते. मग माणसाला शोभणाऱ्या साड्या कशा निवडाव्यात इथपासून ते त्या निदान शोभेल अशा कशा नेसाव्यात यावर सविस्तर आणि उदारपणे आपले अनुभव आणि विचार व्यक्त करून मगच चर्चा थांबते. एखादी पोक्त बाई जर असेल तर आमच्यावेळी‌ असं नव्हतं इथून सुरुवात होऊन मग त्यावेळच्या खऱ्या आणि काल्पनिक अनुभवांचा स्वतंत्र पाठ दिला जातो. याशिवाय भिशीतल्या पदार्थांना चव कशी येणार? आता मला सांग मी जर साडीच पाहिली नाही तर या चर्चेत मी‌ काय डोंबल भाग घेणारे. आणि नाही बोलता आलं तर काय तिथे शुंभासारखी‌ गप्प बसून राहू?"

माझ्या ज्ञानात बरीच भर पडली‌ होती. हिची‌ समस्या मला कळली होती पण तरीही मला फार काही‌ करण्यासारखे नसल्याने, मी केविलवाणा हसलो. हे आख्यान बहुतेक त्या पोक्त बायकांच्या कानावर पडले असावे, त्या कौतुकाने माझ्या बायकोकडे पाहत होत्या. शेवटी त्यांनीच थोडी जागा करून आम्हाला पुढे जाऊ दिले. थोड्या प्रयत्नाने ती नवरी‌ आणि तिने नेसलेली‌ साडी‌ दोन्हींचे संपूर्ण दर्शन झाले. हिचा जीव भांड्यात पडला.