Sunday, November 27, 2016

सुटीतला बाजार

एखाद्या मोठ्या सुटीतल्या आळसावलेल्या दुपारी, उन्हात जायला बंदी म्हणून घरात कंटाळलेली आम्ही मुलं कंटाळा आल्याने आजीच्या मागे लागत असू. मग ती तिचे ठेवणीतले खेळ शिकवत असे. एका दुपारी तिने दुकान मांडायला सांगितलं. “दुकानात विकायला ठेवायला आमच्याकडे काहीच नाही”, “आणि दुकानात द्यायला पैसे, ते कुठून आणायचे?”, “दुकान मांडणार कुठे?”, “आणि गिऱ्हाईक कोण?”, आम्ही नेहमीप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आजीकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असत, तशी ती आजही होती. तिने आम्हाला अंगणात हिंडून गळालेले कोवळे फणस, छोटे नारळ, काळी पडून गळालेली सिताफळं, जास्वंदीची वाळलेली फुले असं काहीबाही गोळा करून त्याचे वेगवेगळे ढीग करायला सांगितले. “हा तुमचा दुकानात विकायचा माल आणि हे तुमचे पैसे.”, प्राजक्ताच्या मूठभर बिया पुढे करत ती म्हणाली. त्या सोनेरी मोहरांनी आम्ही क्षणात कितीतरी श्रीमंत झालो. व्हरांड्यात बाजार भरला. लवकरच त्यात गोगलगायीचे शंख, रगीबेरंगी खडे अशा मौल्यवान गोष्टी, दगडावर केलेली वनीषधी अशा वेगवेगळ्या गोष्टींची भर पडली. घटका-दोन घटका सरल्या आणि बाजारातील माल संपू लागला, रोकड गायब होऊ लागली आणि बाजारपेठा बळकावण्यासाठी युद्धाला तोंड लागलं. व्हरांड्याची रणभूमी व्हायच्या आत आजीने Ice-cream वर दोन्ही गटांमध्ये तह घडवून आणला आणि सेना आपापल्या शिबिरांमध्ये झोपायला रवाना केली. नंतर बऱ्याच सुट्ट्यांमध्ये हा बाजार रंगला, बदलत्या ऋतूनुसार, मुलांनुसार त्याला वेगवेगळे रंगही चढले. पुढे सुट्ट्या लागणं संपलं आणि बाजारही.

माझ्या मुलीला दिवाळीची सुट्टी लागली, दुपारी कंटाळा आला म्हणून तिनी भुणभुण सुरू केली. “चल, अंगणात जाऊ” म्हणून आम्ही नारळ, फणस, फुलं, पानं गोळा करत हिंडू लागलो. तुळशीवृंदावनाशी बाजार भरला. वारशाने पुढे जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मृत्यूपत्राची वाट पहावी लागत नाही, नाही का?

Saturday, January 23, 2016

मोहरीची रोपं

रमा आणि तिच्या आईने दिवाळीत किल्ला केला. किल्ल्यावर मोहरी पेरली. काही दिवसात मोहरीला फूट आली आणि किल्ल्याला हिरव्या पांघरुणाने शोभा आली, छोटी रमा हरखून गेली. दिवाळी संपली, रमानं किल्ला मोडताना मोहरीची छोटी रोपं असलेली माती एका मोठ्या कुंडीत पसरली. रमा उत्साहाने त्या रोपांना पाणी घाले, काळजी घेई. त्या रोपांचं काय करू आणि काय नको असं तिला होई. पाहता पाहता रोपं मोठी होऊ लागली.

रमाचे वडिल एका मोठ्या कंपनीत कामाला होते. ते तिला ह्या रोपांची काळजी घ्यायला मदत करत. Google वर मोहरीच्या निगराणीबद्दल वाचत, वाचलेल्या माहितीचा वापर करत. त्यांनाही ह्या रोपांनी प्रेम लावलं होतं. रमाच्या आईने मोहरी वाढलीच तर तिच्या पानांची भाजी कशी करायची हे ही पाहून ठेवलं होतं. रोजच्या रगाड्यात हा त्या तिघांचा विरंगुळ्याचा विषय बनला होता.

एका रात्री रमाचे वडिल थोडे उशीरा घरी आले. नेहमी आल्यावर ते रमाशी बोलत, चौकशी करत, मग ते तिघे एकत्र जेवत असत. पण आज काहीतरी वेगळे घडत होते. रमाच्या वडिलांचा चेहरा उतरला होता. ते रमाशी काही न बोलता, कपडे बदलून जेवणाच्या टेबलाकडे गेले. जेवताना आज नेहमीप्रमाणे बोलणं, शाळेतल्या मज्जा सांगणं वगैरे काहीच झालं नाही. रमाला हे काहीतरी वेगळं आहे असं जाणवलं. ती झोपायला गेली पण तिला झोप येई ना! तिचे डोळे मिटले होते, तरी कान आई-बाबांकडे लागले होते. बाबा आईला बढतीची संधी नाही, पगारात कपातही होईल असं काहीतरी सांगत होते. त्यांचा सूर वेगळा, थोडा काळजीचा होता. आईच्याही स्वरात काळजी ऐकू आली. विचार करता करता रमाला झोप लागली.

रविवारी सुट्टीच्या दिवशी रमा आणि तिचे बाबा नेहमीप्रमाणे मोहरीच्या रोपांकडे गेले. पाहतात तर काय काही रोपं सुकायला लागली होती. पाणी तर रोज घातलं जात होतं, मग काय झालं अचानक? रमानी रडवेल्या चेहऱ्याने बाबांकडे पाहिलं. बाबा सुकायला लागलेली रोपं मुळापासून काढून काळजीपूर्वक पाण्यात सोडत होते. “या वाढणाऱ्या रोपांना कुंडीतली माती आणि तिच्या मुरणारं पाणी पुरत नाहीये, आपण ती दुसऱ्या कुंडीत नव्या मातीत लावू, तिकडे रुजली तर छान वाढतील. इथेच राहिली तर ही रोपं मरतीलच पण जी आत्ता चांगली दिसताहेत त्यांचीही वाढ खुरटेल.”, बाबांनी रमाला समजावालं. काही दिवसांनी रमानं पाहिलं तर त्या हलवलेल्या रोपांपैकी काही रोपं छान रुजून वाढू लागली होती.


काही दिवसांनी रमाच्या बाबांनी आईला नोकरी बदलल्याचं सांगितलं. योगायोगानं रमाच्या आईनं मोहरीची भाजी केली होती. रमानं भाजी घेत बाबांना विचारलं, “जशी ती रोपं दुसरीकडे रुजली आणि वाढली, तसेच तुम्हीही नव्या नोकरीत रुजाल का हो?”. जेवणाच्या टेबलावर बऱ्याच दिवसांनी गप्पा फुलल्या होत्या!