Friday, October 16, 2009

चिरोटे

"आपल्याकडे दिवाळीच्या फराळात चिरोटे का करत नाहीत?" - मी.
"तूच का नाही करत?" - आई मला चिडवत म्हणाली.
आईने हुशारीने एका दगडात दोन पक्षी मारले होते. चिरोटे जमले नसते तर मी पुन्हा नाव काढले नसते, जमले असते की आयते चिरोटे खायला मिळाले असते. माझ्या इज्जतीचा प्रश्न होता.

आईला चिरोटे कसे करायचे हे विचारायचा प्रश्नच नव्हता. साठेबाईंना पूर्ण शरण जायचं ठरवलं. पुस्तक उघडलं, चिरोट्यांची कृती शोधली. साहित्य जमवलं. कृती वाचून त्या प्रमाणे चिरोटे करायला सुरुवात केली. पहिल्याच वाक्यात ’मैदा, तूप, मीठ एकत्र करून त्याची पोळ्यांसारखी कणीक मळावी’ असं लिहिलं होतं. पहिलाच घास घशात अडकला. पोळ्यांशी संबंध फक्त खाण्यापुरताच असल्याने, ’त्यांची’ कणीक कशी तिंबतात हे कुठे माहित होते? या पुस्तकाच्या सुरुवातीला ’हे पुस्तक ज्यांनी आधी कधीही स्वयंपाक केलेला नाही’ अशांसाठी असल्याचा उल्लेख असल्याने, मोठ्या विश्वासाने ते उचलले होते. आता आली का पंचाईत. पण धीर सोडला नाही. मैदा, तूप आणि मीठ एकत्र करून ते कालवायला सुरुवात केली, बराच वेळ कालवलं तरी काही ते मिश्रण एकजीव होऊन कणीकेजवळ जाईना. अजूनही मैदा पीठाच्या रूपातच होता, फक्त तूपामुळे त्याला थोडा ओशटपणा आला होता इतकेच. मी हैराण! त्या पीठाने भरलेल्या परातीकडे मी विषण्ण नजरेने पहात असताना, माझी बहीण तिथे आली. मोठ्या तपानंतर समोर प्रकट झालेल्या देवाला भक्त ज्या आशेने मनातील ईप्सित सांगतो, त्या आशेने मी तिला माझी समस्या सांगितली. ’अरे, त्यात पाणी कोण घालणार?’ असे मोठ्याने हसत म्हणून ती देवाप्रमाणेच अंतर्धान पावली. घ्या! साठेबाईंनी साहित्यात पाण्याचा उल्लेखच केला नव्हता. ही कणीक भिजवायला पाणी लागते हे कोण सांगणार? आणि म्हणे ’हे पुस्तक ज्यांनी आधी कधीही स्वयंपाक वगैरे, वगैरे ...

एक प्रश्न सुटला. पाणी घ्यायला गेलो आणि दुसरा पुढे दत्त म्हणून उभा! किती पाणी? पण ’आता माघार नाही’ या निर्धाराने, मी तपेलीभर पाणी घेऊन बसलो. कधी पाणी कमी, कधी मैदा कमी असं करता करता एकदाची कणीक मळली गेली. पहिली पोळी लाटून पालथी टाकली तर तिने बंड पुकारून आपला आकारच कमी केला. तो पुन्हा पहिल्यासारखा करायला लाटली तर आपल्या मध्यभागातून तिने पोळपाटाचे अंतरंग दाखवायला सुरुवात केली. अशा अनेक संकटांना तोंड देत कशाबशा त्या पोळ्या लाटून झाल्या. पोळ्या लाटण्याच्या दिव्यातून बाहेर पडल्यावर त्यांना साटं लावणं, त्या एकावर एक ठेवून त्याची सुरळी करणं, काप करणं, ते काप पुन्हा लाटणं वगैरे कामं तर फारच सोपी होती.”आता ते लाटलेले काप तळावेत आणि तळताना त्यावर झऱ्याने तूप उडवावे’ अशी सूचना साठेबाईंनी केली. पण ते तूप उडवताना, ’अपवित्रं पवित्रो वा’ म्हणताना भटजी पाणी उडवतात तसे उडवावे का म्हैस धुताना पाणी उडवतात तसे उडवावे हे सांगायला त्या विसरल्या. शेवटी पाण्यात पडलं की पोहता येतं या न्यायाने पहिला चिरोटा तुपात सोडला आणि पोहू लागला. पोहता पोहता टम्म फुगला आणि माशाच्या कल्ल्यांसारखे त्याला पदरही सुटले.

तब्बल चार तासांच्या मेहनतीनंतर चिरोटे नामक प्रकार तयार झाल्यावर आईच्या ’तूच का नाही करत?’ या उद्गारांचा खरा अर्थ लक्षात आला. नरकचतुर्थीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर फराळ करताना सगळ्यांनी चिरोटे चांगले झाल्याची पावती दिली. कंबर, पाय, मनगटं आणि अर्थात मान असं सगळं मोडून तयार झालेल्या चिरोट्यांना नावं ठेवायची काय बिशाद होती कोणाची!

3 comments:

paamar said...

शाबास, बल्लवाचार्य बापट ! आता यापुढे ’कुकिंग च्या क्वेरीज’ पण तुझ्यावर फायर करेन !

Unknown said...

HA HA HA .... Uttam jamalet "Chirote"

Kranti said...

woww! :O .. where is its photo?
Ashutosh, ata tujhyakadun live demo ghetla pahije ... BTW, how did you directly jump to Chirote? I guess, bakicha faral tujhya dawya hatacha khel asel :D