Monday, November 25, 2013

हरवले ते गवसले

नेहमीसारखा कामावरून घरी आलो, कपडे बदलले आणि जरा बसणार तेवढ्यात आठवलं की मित्राला फोन करायचा आहे. कामावरून घरी आल्यावर जिथे नेहमी मोबाईल ठेवतो तिथे सवयीने हात गेला, पण सवयीप्रमाणे मोबाईल मात्र हाताला लागला नाही. इकडे तिकडे ठेवला असेल म्हणून सगळी खोली शोधली पण तरीही तो मिळाला नाही. माझा नंबर वेगवेगळ्या मोबाईलवरून लावून पाहिला तर तो "बंद" किंवा "संपर्कक्षेत्राच्या बाहेर" असल्याचे कळत होते. दुचाकीवरून आल्यावर उतरताना पडला असेल म्हणून घरासमोरचा रस्ता आणि बाग शोधली. तरीही मिळाला नाही. कामावरून निघताना मी फोन केला होता, त्यामुळे तिथून निघेपर्यंत तो होता हे आठवत होतं. म्हणजे रस्त्यातच कुठेतरी पडला होता. जेवून हा १० किलोमीटरचा रस्ता धुंडाळायला मी आणि देवकी निघालो. तास दीडतास रात्री ९ च्या अंधारात (पुणे महानगरपालिकेला रस्त्यावर पुरेसे दिवे लावायला आणि असलेले चालू ठेवायला मनाई आहे.) फेरफटका मारल्यावरही तो सापडला नाही. मोबाईल हरवला हे जवळ जवळ निश्चित झाले. दरम्यान BSNL च्या call center ला संपर्क करून माझा नंबर बंद करता येईल का आणि दुसरे SIM मिळेल का ह्याची चौकशी केली आणि हे सगळे करण्यास मला BSNL च्या कार्यालयात जाण्याशिवाय पर्याय नाही असे कळले. म्हणजे निदान दुसऱ्या दिवसापर्यंत काही करता येणार नाही हे स्पष्ट झाले.

दुसऱ्या दिवशी BSNL मध्ये जाऊन जुने SIM बंद करून नवे SIM घेतले. हा अनुभव अतिशय चांगला होता. BSNL असून त्यांच्या कार्यालयात गेल्यापासून १० व्या मिनिटाला मी नवं SIM घेऊन बाहेर पडलो होतो. आता नव्या मोबाईलचा शोध आणि हरवलेले नंबर गोळा करणे हे मोठं काम पुढे होतं. पण तिथपर्यंत गाडी पोचलीच नाही.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी‌ माझ्या आईला फोन आला आणि त्याने माझा मोबाईल बोटक्लब रोडवरच्या सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या श्री. राठींच्या बंगल्यातील श्री. जहांगीर बेग ह्या रखवालदाराकडे असल्याचं सांगितलं. मी आणि माझे वडिल तिकडे पोचलो. त्याने माझा मोबाईल देताना, तो त्याच्याकडे कसा आला याची हकिगतही सांगितली. मी विधानभवनाचा चौक ओलांडून जात असताना, तो मोबाईल रस्त्यात पडलेला, माझ्यामागून येत असलेल्या श्री. राठींच्या यादव नावाच्या चालकाने पाहिला. त्याने तो उचलला तेव्हा त्यातील बॅटरी इतर कुठेतरी पडली होती. मोबाईल वरील नावांमधून हा मोबाईल कोणाचा आहे, हे कळेल म्हणून त्या भल्या माणसाने बॅटरी मिळवण्यासाठी दुसऱ्या दिवशी विधानभवनाकडे धाव घेतली. सुदैवाने ती बॅटरी त्याला तिथे मिळाली. मोबाईल सुरु करून त्यातून त्याला माझ्या आईचा क्रमांक कळला आणि त्याने आईला कळवले. रखवालदार एका ठायी असेल म्हणून त्याने तो रखवालदाराकडे सांभाळायला दिला.

या दोघांच्या प्रामाणिकपणाचे आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाचे कौतुक व्हावे म्हणून हा लेख!