Friday, July 28, 2006

आरती प्रभू - अमूर्ताचा शिलेदार

आरती प्रभू - नावातच सारं आलं. समुद्राच्या वाळूसारख्या चंचल भावना, कल्पना घट्ट धरून त्यांना कवितांचे लगाम घालणार शब्दांचा सारथी. राग (प्रेम या अर्थी), लोभ, मत्सर, विरह, द्वेष, जितक्या म्हणून प्रकारे माणसं एकमेकांशी व्यक्त होऊ शकतात त्या सर्वांचे साग्रसंगीत दर्शन याच्या साहित्यातून दिसते. त्या साहित्याला असलेली कोकणची गूढ 'पार्श्वभूमी' (श्लेष अपेक्षित) त्या भावनांचे रंग अधिक गडद व्हायला मदत करते. क्वचित अनागर वाटणाऱ्या या साहित्यातला गोडवा अनुभवाने आणि परिचयाने वाढत जातो.

मला आवडलेल्या काही कविता मी इथे देत आहे. शक्य होईल तसे त्यांचे रसग्रहण करण्याचा विचार आहे.

नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना

(हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं.
'मग फुल काय म्हणालं?' एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती.
'कोनाला?' 'अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला? मग फुल काय म्हणालं?'
'तू शांग...'
मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला?' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. - मी-एक नापास आजोबा, पु. ल. देशपांडे)

लव लव करी पातं
रसग्रहणासहित

Wednesday, July 26, 2006

लव लव करी पातं

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले

आरती प्रभूच्या कविता वाचायला लागल्यावर माझंही असंच झालं आहे. या कवितांनी वेड लावलं आहे. मनातल्या व्यक्त आणि अव्यक्ताच्या सीमेवरल्या तरल भावनांचं वर्णन केवळ 'प्रभू'च करू जाणे. 'लव लव करी पातं' मधील कातरता अशीच मुग्ध करणारी.

लव लव करी पातं, मन नाही थाऱ्याला
एकटक पाहू कसं लुकलुक ताऱ्याला

कधीकधी संध्याकाळी मन अस्वस्थ होतं. गवताचं पातं जसं स्थिर राहत नाही तसं मनही अशावेळी विचारांचे झोके घेत राहतं. आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपलं काहीही ऐकायचं नाही असा पण करून, आपल्यालाही सळो की पळो करून सोडतं. बेचैनी वाढत राहते. लहान मुल जसं लहानसहान आवाजाने दचकून इकडे तिकडे पाह्तं तसं पानं जरी सळसळली तरीही उगाचच तिकडे पळतं. बरं यातून सुटका? नाही! बरोबरची माणसं देखील वेड लागलं असंच समजतात, त्यांना कुठे माहीत असतं मनात कुठलं वादळ उठलेलं असतं ते.

चव चव गेली सारी जोर नाही वाऱयाला
सुटं सुटं झालं मन धरू कसं पाऱ्याला

कुणी कुणी नाही आलं फड फड राव्याची
ऋणु झुणु हवा काही गाय उभी दाव्याची

तट तट करी चोळी तुट तुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारुबाई साठीची

मनाला हातात न येणारा पारा, कुणाची चाहूल लागली की दाव्याला झटका देऊन उभी राहणारी गाय यांच्या उपमा, पडलेल्या वाऱ्यातून दिसणारी बेचैनी, उधळलेल्या मनाला लगाम घालणारी साठीच्या पारुबाईची परिपक्वता या मात्रांच्या तालावर मनाच्या वेळूंतून घुमणारी ही शीळ, मनात पुन्हा वादळ उठायला पुरेशी ठरते.